उपक्रम ~ मुलाखत.
मुलाखत म्हणजे संवाद. मात्र हा संवाद पूर्वनियोजित असतो. तो हेतूपूर्वक घडवून आणला जातो. मुलाखत देणारा, मुलाखत घेणारा आणि ती मुलाखत ऐकणारा, पाहणारा वाचणारा या तिघांच्या सहभागातून मुलाखत पार पडते ' जेव्हा क्रमबद्ध प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचे जीवन आणि आणि कर्तुत्व श्रोत्यांसमोर उलगडून दाखवते, तेव्हा त्यांच्यात झालेला संवाद म्हणजे मुलाखत होय.' थोडक्यात दोन व्यक्तींमध्ये नियोजनपूर्वक झालेला वैचारिक, भावनिक संवाद म्हणजे मुलाखत होय. ज्यांच्याजवळ 'सांगण्यासारखे' काही आहे आणि ज्यांच्याकडून 'ऐकण्यासारखे' काही आहे अशा व्यक्तींची मुलाखत घेतली जाऊ शकते.
मुलाखतीचा हेतू~ (०१) मुलाखत देणाऱ्याच्या व्यक्तीमत्त्वाचे विविध पैलू समजून घेण्यासाठी (०२) त्या व्यक्तीच्या कार्यावर प्रकाश टाकण्यासाठी. (०३) अनेकांच्या संघर्षगाथा असतात. जनमाणसांच्या मनात तो संघर्ष जाणून घेण्याची इच्छा असते. ती इच्छा जाणून घेण्यासाठी. (०४) व्यक्तीच्या कर्तुत्वाबरोबर त्या व्यक्तीच्या आत दडलेला माणूस समजून घेण्यासाठी. (०५) विचारवंतांची विविध विषयांवरील मते जाणून घेण्यासाठी. (०६) एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीकडून नवे काही माहीत करून घेण्यासाठी.
पेन व वहीमध्ये झालेली मुलाखत/संवाद.
घंटा वाजली तशी मुले शाळेत गेलीत. परिपाठ संपला व मुले लगबगीने आपापल्या वर्गात जाऊन बसली. मुलांच्या मागून लगेच गुरुजी वर्गात दाखल झाले. मुलांची हजेरी झाली तसे लगेच गुरुजींनी प्रत्येक मुलांना वही-पेन काढण्यास सांगीतले. दप्तरातून मुलांनी आपापली वही-पेन बाहेर काढली. गुरुजींनी मुलांना आपल्या आवडीचे दोन-तीन चित्रे काढण्यास सांगितली.
तेव्हा वही व पेनमध्ये झालेला संवाद.
वहीताई: - काय पेनदादा, आज काय लिहायचं ठरवलय?
पेनदादा:- वहीताई, गुरुजींनी आवडीची चित्रे गिरवण्यास सांगितली.
वही ताई:- व्वा! आवडीची चित्रे. मग आज नेमके कोणती आणि कशाची चित्रे काढशील?
पेनदादा:- अग वहीताई, थोडा विचार करू दे की.
वहीताई:- होय बाबा, विचार तर करावाच लागेल. कोणतीही गोष्ट विचारात घेतल्याशिवाय कसली शक्य? कोणत्याही निर्मितीचा उगम हा विचारातूनच होत असतो.
पेनदादा:- ताई, काढण्यासारखी तर भरपूर चित्रे आहेत, परंतु कोणती चित्रे काढावीत यासाठी मनात थोडा गोंधळ चालू आहे.
वहीताई:- होय का. मी काही चित्रे काढायची सुचवू का?
पेनदादा:- वाह! मग तर फारच छान होईल.
वहीताई:- बघ पेनदादा, आज हल्ली माणूस निसर्गात सौंदर्य घालणारी चित्रे काढताना दिसतो परंतु निसर्गाचा र्हास होतानाची चित्रे रेखाटताना मात्र फारसा आढळत नाही. त्याला निसर्गाचा ऱ्हास होत आहे हे माहीत नाही असं सुद्धा होत नाही परंतु याकडे माणूस हल्ली दुर्लक्षीत झाला आहे हे सत्य नाकारता येत नाही.
पेनदादा:-अगदी खरयं ताई, निसर्गात कोणकोणते घटक असतात?
वही ताई:- प्राणी, वनस्पती, मृदा, हवामान, पाणी, हवा, अन्न, वृक्ष आदि.
पेनदादा:- छान ताई, तर आज मी या घटकांवर आधारित चित्रे काढणार आहे.
वहीताई:- ऑल दि बेस्ट दादा, नंतर कोणती चित्रे काढलीत त्या संदर्भाने मला सांगशील.
पेनदादा:- होय ताई नक्कीच, काढलेली चित्रे मी तुला दाखवणार बरं का.
पेनदादा चित्रे काढतो व वहीताईला दाखवतो.
वहीताई:- पेनदादा, ही चित्रे?
पेनदादा:- होय ताई, अन्नाची नासाडी, नानाविध व्यसन व हवा प्रदूषण दर्शविणारी चित्रे काढलीत.
वहीताई:- दादा, तुला ही चित्रे कशी काय सुचली रे?
पेनदादा:- काय सांगू ताई, मी सुटाबुटातल्या, नोकरदारांच्या, सुशिक्षित माणसांच्या प्रत्येकाच्या खिशाला असतो ना. तेव्हा मला ही चित्रे सहज दिसतात, पण या बुद्धिजीवी मानव प्राण्याला दिसत नसेल का? की त्यांना कळत नसेल? की जाणवत नसेल? लग्नसमारंभात, वेगवेगळ्या पार्टीमध्ये लोक जेवताना अन्नाची नासाडी करतात. गरजेपेक्षा जास्त अन्न ताटात घेतात व त्यामुळे शिल्लक अन्न तसेच ताटात ठेवतात त्यामुळे शिल्लक अन्न वाया जाते. अन्नाच्या नासाडीमुळे अनेक नैसर्गिक स्रोतांचीही नासाडी होते. अन्नधान्य पिकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यापैकी २० ते २५% पाणी वाया जाते. वीज, खत, फवारणी, शेतकऱ्यांच त्यामागील अथक परिश्रम अशा अनेक गोष्टी नासाडीमुळे अप्रत्यक्षपणे वाया जातात. गरीबीमुळे अनेक जण उपाशीपोटी आहे आणि इकडे मात्र अशा लोकांमुळे अन्न वाया जात आहे. हे या लोकांना का बर कळत नसेल. अन्न वाया घालवणार्या लोकांसाठी हे चित्र मी रेखाटले आहे. या चित्रातून अन्नाचे महत्त्व तरी त्यांच्या लक्षात येईल असे मला वाटते.
दुसरे चित्र हे माणसाच्या निसर्गातील हस्तक्षेपामुळे पृथ्वीवर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. औद्योगिक, वाहतूक, वाढती लोकसंख्या यामुळे पृथ्वीवर कमालीचे प्रदूषण वाढलेय. या प्रदूषणाचे परिणाम संपूर्ण सजीवसृष्टीला व मानवजातीवर होऊ लागलेत. हवा प्रदूषणातील विषारी वायू, धूर, धुलिकण, सुक्ष्मजीव यांसारख्या घातक पदार्थांमुळे मानवाचे पर्यायाने निसर्गाचे वयोमान दिवसेंदिवस कमी होत आहे. माणसाने त्यांचं राहणीमान उंचावण्यासाठी व हव्यासापाई निसर्गाला दुर्लक्षित करत आहेत. हवा प्रदूषणामुळे माणसांच्या शरिरावर विपरित परिणाम होत आहे. हे माणसाला माहित असूनही त्याकडे डोळेझाक करत आहेत.
तसेच तंबाखू, गुटखा, सिगारेट, बिडी, मद्यप्राशन आदी. सेवनाचे प्रमाण सुद्धा बुद्धीजीवी प्राण्यामध्ये विपुल प्रमाणात वाढलेले आहेत. या सेवनामुळे तोंड, घसा, फुफ्फुस, पोट, किडनी व मूत्राशयाचा कर्करोग होतो. हृदयरोग व रक्तवाहिन्यांचे विकार, मेंदूचे विकार, छातीत दुखणे, हृदयविकाराचा झटका येणे असे अनेक प्रकारचे विकार होतात. या सेवनाचे दुष्परिणाम माहीत असतानाही, जनजागृती होत असतानाही लोक राजरोसपणे या व्यसनाचे सेवन करताना दिसत आहेत. अशा मानसिकतेला काय म्हणावे बरं?
या चित्रांमधून लोकांना चांगला संदेश, उपदेश मिळावा म्हणून ही चित्रे काढली आहेत.
वहीताई:- अगदी खरयं दादा, तू जे सांगितले ते अगदी खर आहे. सारासार विचार न करता माणूस या सेवनांच्या पूर्णता आहारी गेला आहे. त्यामुळे कुटुंबात, समाजात वाद होत आहेत. माणसांची मानसिकता दिवसेंदिवस ढासळत आहे. आयुष्य हे एकदाच मिळते हे बर्याच लोकांना का बरं कळत नसेल? का बरं उमजत नसेल? अशा या व्यसनी व समस्या निर्माण करणार्या माणसांमुळे कुटुंबातील इतर सदस्यांना, समाजाला व देशाला त्रास सहन करावा लागतो. अशा या व्यसनी, हव्यासी लोकांमुळे कुटुंबाची, समाजाची पर्यायाने देशाची प्रगती होणे थांबते हे या लोकांना का बरं कळत नसेल? म्हणतात ना विकृत बुद्धि विनाशाला आमंञित करते.
समाजातील, पर्यावरणातील या समस्या का निर्माण झाल्या असाव्यात? हे या बुद्धिजीवी प्राण्याला का समजू नये किंवा का बरं समजत नसेल? मानवाला, संपूर्ण सजिवसृष्टीला व निसर्गाला विघातक ठरणाऱ्या अशा प्रकारच्या समस्या, प्रदुषके कुठेतरी, केव्हातरी थांबणे, थांबवणे खुप गरजेचे आहे. अन्यथा मानवनिर्मित समस्या, प्रदूषके नष्ट करणे खूप खूप कठीण असेल.
खरच प्रत्येक माणसाने या समस्यांवर, प्रदूषकांवर जाणीवपूर्वक व गांभिर्याने विचार करून आपल्यामुळे कोणालाही ञास होणार नाही अश्या स्वरूपाचे चांगले जीवन व्यतीत करावे हीच अपेक्षा.
अशाप्रकारे वही व पेनधील मुलाखत/संवाद घडून आला.
मुलाखत निर्मिती व लेखन~ संतोष मो. मनवर
जि.प.उ.प्रा.शाळा पंचाळा जि.प. वाशिम