परिपाठ

या शैक्षणिक ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा!!

Saturday, April 6, 2019

गुढीपाडवा

             

             आपले भारतीय सण हे आपल्या समृद्ध परंपरेचे प्रतीक आहेत. आपण आपले सण खूप मोठ्या उत्साहात साजरे करतो. हे सण आपल्यामध्ये एकोपा निर्माण  करत असतात. भारतातील प्रत्येक सणाचे आपले धार्मिक महत्व, पावित्र्य आणि इतिहास आहे आणि अशाच काही सणांपैकी एक म्हणजे गुढीपाडवा! 
               गुढीपाडवा भारतामध्ये आणि प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. गुढीपाडव्याने हिंदू नववर्षाची सुरुवात होते. महाराष्ट्रामध्ये घराबाहेर दारासमोर गुढी उभारून गुढीपाडवा साजरा करतात. चैत्र महिना भारतीय सौर पंचांगानुसार वर्षाचा पहिला महिना आहे आणि ह्या महिन्याची सुरुवात चैत्र प्रतिपदेने होते. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस आंध्र प्रदेश, कर्नाटक ह्या राज्यांमध्ये उगादी, चेटी चांद अशा वेगवेगळ्या नावांनी आणि पद्धतींनी साजरा केला जातो. 
                गुढीपाडवा हा हिंदू सणांपैकी एक महत्वाचा सण आहे. गुढीपाडव्याचा इतिहास हा वेगवेगळ्या आख्यायिका आणि कथांवरून माहिती करून घेतला जाऊ शकतो. एका आख्यायिकेनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रम्हाने ह्या सृष्टीची निर्मिती केली होती आणि त्याच वेळी सत्ययुगाची सुरुवात झाली. दुसऱ्या एका कथेनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी राम चौदा वर्षे वनवास भोगून आणि रावणाचा पराभव करून अयोध्येत परतले होते. त्यावेळी अयोध्येतील जनतेने गुढ्या, तोरणे उभारून रामाचे स्वागत केले होते.
                शालिवाहन हे महाराष्ट्राच्या सलग इतिहासातलं पहिलं पराक्रमी घराणं. शालिवाहन कुळातला गौतमीपुत्र सातकर्णी हा सर्वांत पराक्रमी राजा...प्रतिष्ठान.. म्हणजेच आताचं औरंगाबाद जिल्ह्यातलं पैठण ही त्याची राजधानी. आताचा महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि मध्य प्रदेश एवढं त्याचं विस्तीर्ण साम्राज्य होतं. राजकीय स्थैर्यामुळे व्यापार थेट युरोपपर्यंत पोचला होता. महाराष्ट्रातल्या कापडांना आणि वस्तूंना अगदी रोममध्ये सुद्धा खूप मागणी होती.

                इसवी सन ७८ मध्ये नाशिक येथे मध्य आशियातल्या शकांनी आपल्यावर फार मोठा हल्ला चढवला होता. ज्याला लीलया परतून लावला पैठणच्या गौतमीपुत्राने. तेव्हापासूनच महाराष्ट्रात गौतमीपुत्राच्या शालिवाहन या कुळाच्या नावाने कालगणना सुरू झाली.आपल्या प्रत्येकाला या गौरवशाली इतिहासाचा अभिमान वाटावा असा हा नववर्षाचा पहिला दिवस.  

              गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये लोक आपल्या घराच्या प्रवेशद्वारासमोर गुढी उभारून हा दिवस साजरा करतात. ह्यादिवशी बांबूच्या लांब काठीच्या एका टोकाशी तांब्याचा कलश, एक वस्त्र, कडुलिंबाची पाने आणि साखरेचे बत्तासे लावून आणि गुढीची पूजा करून घराबाहेर दाराजवळ हि गुढी उभारली जाते. गुढीभोवती रांगोळी काढली जाते. फुले वाहिली जातात. गुढीपाडव्याच्या दिवशी पाण्याच्या घड्याचे दान देणे शुभ मानले जाते. नैवैद्यासाठी गोडधोड बनवले जाते.
               गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाच्या पानांचे सेवन केले जाते. त्यामागे शास्त्रीय महत्व आहे. कडुलिंबाची पाने खाल्ल्याने पचनास मदत होते. चैत्र महिन्यामध्ये हिवाळ्याचा थंड आल्हाददायक काळ संपून उन्हाळा सुरु होतो. कडुलिंबाची पाने अंघोळीच्या पाण्यात घातल्याने शरीराला थंडावा मिळतो.कडुलिंब पित्ताचा नाश करते आणि त्वचेसाठीही अतिशय लाभदायक असते.   
              गुढीपाडव्याच्या दरम्यान हवामान समशीतोष्ण आणि उत्साहवर्धक असते.वसंत ऋतूचे आगमन झालेले असते. झाडांची पाने हि शिशिर ऋतूमध्ये गळून गेली असतात तर  झाडांना नवीन पालवी फुटत असते. सभोवतालची झाडे , वृक्षवल्ली टवटवीत दिसतात.गुढीपाडव्याच्या दिवशी लोक आपल्या पारंपरिक पोषाखामध्ये एकत्र येतात व एकमेकांना शुभेच्छा देतात, ज्यामुळे सामाजिक बांधिलकी जोपासली जाते.                                               गुढीपाडव्याच्या दिवशी दारी उभारलेली गुढी हि पावित्र्य, मांगल्य आणि समृद्धीचे प्रतीक असते.नव्या गोष्टींचा आरंभ म्हणजे पाडवा. पाडव्याच्या दिवशी नवीन कामांना सुरुवात करणे आध्यात्मिकरित्या शुभ मानले जाते. या दिवशी सुरु केलेली कामे यशस्वी होतात असे मानले जाते. त्यामुळे गुढीपाडव्याला आध्यात्मिकही महत्व आहे.                              
                  




No comments:

Post a Comment

****