परिपाठ

या शैक्षणिक ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा!!

Saturday, April 13, 2019

म. ज्योतिबा फुले

     (जन्मदिन - एप्रिल ११, इ.स. १८२७)

                महात्मा जोतीबा फुले हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. जोतिबा फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होते. त्याच गावी महात्मा फुल्यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. जोतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. शेवटच्या पेशव्यांच्या काळात महात्मा फुले यांचे वडील आणि दोन चुलते फुले पुरवण्याचे काम करीत होते, त्यामुळे गोऱ्हे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी, पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ झाले. 

               महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणास प्रोत्साहन देऊन स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांनी भारतातील मुलींची पहिली शाळा १८४८ साली पुणे येथे भिडेंच्या वाड्यात उघडली. आपल्या पुरोगामी विचारांची निर्भयपणे मांडणी केली व स्वत:चे विचार आचरणात आणले. जनतेने त्यांना महात्मा ही उपाधी बहाल केली होती. ही पदवी त्यांना इ.स.१८८८ या साली मिळाली.
                     सप्टेंबर २३, इ.स. १८७३ रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. पुरोहितांकडून होणाऱ्या अन्यायापासून, अत्याचारापासून व गुलामगिरीतून तथाकथित शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.'सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच  मध्यस्ती ॥' हे समाजाचे घोष वाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. सत्यशोधक समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.शिक्षणाचे महत्त्व पटवून देणार्‍या त्यांच्या कवितेच्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत. –
         “ विद्य्येविना मति गेेेली|
        मतिविना नीती गेली।
        नीतिविना गती गेली। 
        गतिविना वित्त गेले।
       वित्ताविना शूद्र खचले। 
      इतके अनर्थ एका अविद्येने केले। ”
           महात्मा फुले यांनी मानवास सत्यधर्माचा जो बोध केला त्यातीलही काही वचने आपण वाचली की लक्षात येते की, ज्योतीरावाचा आवाका किती मोठ्ठा होता . त्यांना अखिल विश्वाला कवेत घेणाऱ्या माणसाला माणूस म्हणून प्रतिष्ठा देणारा धर्म साकार करायचा होता . त्यासाठी मानवी वर्तनात, म्हणजेच व्यवहारात आमूलाग्र बदल घडवून आणायचा होता .त्यासाठी मानवी स्वभाव आणि मानसिकता यात काय बदल केले पाहिजेत याबाबतही ज्योतीरावांनी विपुल लेखन केले आहे . 'अखंड' या काव्यप्रकारात त्यांनी 'मानवाचा धर्म' , आत्मपरीक्षण , नीती , समाधान , सहिष्णुता , सद्सद्विवेक  , उद्योग , स्वच्छता , गृहकार्यदक्षता  इत्यादी गोष्टींवरही भाष्य केले आहे .
                 
             स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या त्रयीवर नितांत भरवसा ठेवणारे आणि सामाजिक विषमतेच्या विरोधात आवाज उठविणारे म. फुले हे महापुरुष होते. त्यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर म्हणून ओळखले जाते. ते मानवतावादी विचाराचे होते. त्यांनी मेकॉलेच्या खलित्यास कडाडून विरोध केला. 'शिक्षण हे वरच्या वर्गापासून खालच्या वर्गापर्यंत पाझरत आले पाहिजे' या विचारास फुलेंचा विरोध होता कारण इंग्रजाचा भर प्रथम वरचा वर्ग शिकला पाहिजे व नंतर खालचा वर्ग शिकावा यावर होता. 'प्रथम खालच्या वर्गातील लोकांना शिक्षण देऊन नंतर वरच्या वर्गातील लोकांना शिक्षण दयावे 'आधी कळस मग पाया असे न होता, आधी पाया मग कळस’ अशा पद्धतीने शिक्षणप्रणाली असण्यावर म. फुलेंचा आग्रह होता. प्रथम उपेक्षितांना शिक्षण नंतर अपेक्षितांना शिक्षण’ हे सूत्र अंमलात आणावे, यावर भर देण्यात आला.
                पूर्वीच्या काळामध्ये या परिस्थितीत स्त्रियांनी शिक्षण घेणे. म्हणजे अधर्मच करणे होय. त्यामुळे स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे कायमची उघडली जावी, म्हणून म. फुलेंनी स्त्री-शिक्षण मोहीम सर्वप्रथम हाती घेतली. शिक्षण हे समर्थ स्त्री म्हणून जगण्यासाठी दिले जावे. स्त्रियांचा खरा धर्म त्यांना शिक्षण देणे होय. स्त्रियांच्या मानसिकतेसाठी व सक्षम स्त्री घडवण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही. हे ओळखून म. फुलेंनी आपल्या पत्नीस शिक्षण देऊन आदय शिक्षिका म्हणून कार्यास सुरुवात केली आणि स्त्री-शिक्षण मोहमेस सुरुवात केली.
             शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होत.
                   समाज सुधारण्याच्या कार्याला गती देण्यासाठी व ते व्यापक  करण्यासाठी १८७३ साली त्यांनी ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना केली. ‘कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे’ मानवाने गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांचे मत होते. त्यांनी लिहिलेल्या ‘शेतकर्याचा आसूड’ या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्रयाची वास्तवता विशद केली आहे. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा क्रांतिकारक म्हणून ही जोतीरावांचे दर्शन होते. ‘नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे’ हा विचार मांडणारे जोतीराव एक तत्वचिंतक व्यत्तिमत्त्व म्हणूनही आपल्यासमोर येतात.
                 'सार्वजनिक सत्यधर्म' हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्र म्हणून 'दीनबंधू' हे साप्ताहिक चालविले जात असे. तुकारामांच्या अभंगांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. अभंगांच्या धर्तीवर त्यांनी अनेक 'अखंड' रचले. त्यांना सामाजिक विषमतेचे जागतिक भान होते. आपला 'गुलामगिरी' ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना त्यांनी समर्पित केला. 'अस्पृश्यांची कैफियत' हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे. सार्वजनिक 'सत्यधर्म' हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. १८९१ मध्ये प्रकाशित झाला. 
        एक सुर्य सर्वा प्रकाशास देतो |
        उद्योगा लावितो प्राणीमात्रा ||१||
        मानवासहीत प्राण्यांचे जीवन |
        सर्वांचे पोषण तोच करी ||२||
        सर्वा सूख देई जनकाच्या परी |
        नच धरी दूरी  कोणी एका ||३||
        मानवांचा धर्म एकच असावा | 
        सत्यांने वर्तावा जोती म्हणे ||४||
                अशा या थोर विभूतीचे महानिर्वाण 28  नोव्हेंबर 1890  या दिवशी झाले.पण आपल्या कार्याच्या रूपाने ते आजही आपल्या बरोबर आहेत. 

No comments:

Post a Comment

****