परिपाठ

या शैक्षणिक ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा!!

Friday, September 11, 2020

शिक्षक दिन

*शिक्षक दिन*

5 सप्टेंबर - भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्म-दिवस आणि त्या निमित्ताने शिक्षकांप्रती सन्मान प्रकट करण्यासाठी म्हणून आपण हा दिवस साजरा करतो. 'गुरु' यांचे प्रत्येकाच्या जीवनात महत्त्व असतं. समाजात त्यांचे एक विशिष्ट स्थान असतं आणि ते कुणी नाकारू शकत नाही. परंतु आज अशा आदर्श शिक्षकांपेक्षा ही आदर्श विद्यार्थ्यांची समाजाला प्रचंड गरज आहे. पन्नास मुलांना एका वर्गात निरपेक्षपणे आणि सारखे ज्ञान देणारा शिक्षक असतो पण ते ज्ञान आत्मसात करून सुजाण नागरिक म्हणून यशस्वी होणारे पन्नास नसतात हे आपण समजून घ्यायला हवे. त्यामुळे उत्तम शिक्षक असूनही एक वाईट विद्यार्थी त्यांच्या पासून काहीही शिकू शकत नाही तर साधारण शिक्षक लाभून त्यांच्याकडून शिकून आपल्या आयुष्यात प्रचंड यशस्वी होणारा हा उत्तम विद्यार्थी आजच्या काळात अतिशय महत्त्वचा ठरतो. 

डॉ APJ अब्दुल कलाम पासून ते सचिन तेंडुलकर पर्यंत आज सर्वोच्च यशाची ही उदाहरणे हेच सिद्ध करतात की अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही केवळ एक उत्तम विद्यार्थी असल्यामुळेच अशी आश्चर्यकारक झेप त्यांना घेता आली. त्याच्या उत्तम विद्यार्थी गुणांमुळे त्यांचे गुरू आदरणीय झालेत. गुरू नेहमी निरपेक्षपणे आपले काम करतो. त्याचे ज्ञान अविरतपणे तो सर्वांना देत असतो. तो सर्वोच्च आहे आणि राहणार. 

निसर्ग माणसाचा पहिला गुरू. जन्म झाल्यावर श्वास घ्यायला लावणारा अन भूक लागली की रडायला शिकवणारा निसर्ग माणसाला आयुष्यभर शिकवित राहतो. फरक एवढाच की शाळेतील शिक्षक आधी शिकवतो अन मग परीक्षा घेतो. पण निसर्ग नावाचा शिक्षक मात्र आधी परीक्षा घेतो अन मग शिकवतो. निसर्गाच्या शिकण्याचा खरा अर्थ समजणारे आणि त्यातून आपल्या जीवनाचे कल्याण करणारे विद्यार्थी हे सर्वश्रेष्ठ. आपल्या जीवनाचे खरे प्रारुप, जन्म घेण्याचे उद्दिष्ट, आपल्या असण्याचे कारण जर कुणी खऱ्या अर्थाने समजावून सांगू शकत असेल तर तो निसर्ग. या निसर्गातूनच दिव्य दृष्टी लाभलेले भगवान बुद्ध आपण पाहिले. एक उत्तम विद्यार्थी एका बोधी वृक्षाखाली बसुन याच निसर्गाकडून ज्ञान प्राप्त करून भगवान बुद्ध बनले. 

आई ही माणसाला लाभलेली दुसरा शिक्षक. जगातील सगळ्या आई आपल्या मुलांवर सारखे आणि अतोनात प्रेम करतात आणि त्यांना शिक्षण देतात. पण श्यामची आई जर आज अजरामर झाली असेल तर ती साने गुरुजीं सारख्या उत्तम विद्यार्थ्यामुळे. आपले गुरू, आई यांना जर खरी आदरांजली द्यायची असेल तर ते काम एक उत्तम विद्यार्थीच करू शकतो.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही फक्त एक उत्तम विद्यार्थी असल्यामुळेच यशस्वी झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. अगदी पुराणकाळातील कर्ण पासून ते आजच्या काळातील महापुरुषांच्या यादीत एक यशस्वी विद्यार्थी दडलेला आपणास सापडेल. शिक्षकांचे काम प्रत्येक विद्यार्थ्यांला उत्तम नागरिक बनविण्यासाठी ठिणगी देण्याचे असते. अशा अनेक ठिणग्या ते सतत आपल्या सभोवताली ते पाडत असतातही पण अशा ठिणग्या आपल्या हृदयात घेऊन त्याची ज्वाला बनायला एक ज्वालाग्राही जमीन लागते, ती एका उत्तम विद्यार्थ्या कडेच असू शकते. नाहीतर अशा कितीही ठिणग्या पडून काही उपयोग होत नाही आणि म्हणूनच सर्व समान परिस्थिती, समान शिक्षक असूनही फक्त उत्तम विद्यार्थीच आयुष्यात प्रगती करू शकतात. 

प्रत्येक गुरू सुद्धा एक उत्तम विद्यार्थी असल्याशिवाय गुरू होऊ शकत नाही आणि गुरू व्हायला जरी वयाची थोडी गरज असू शकते पण विद्यार्थी म्हणून तुम्ही सुरवात करून आयुष्यभर एक विद्यार्थी म्हणून तुम्ही जगू शकता. एक उत्तम विद्यार्थी व्हायला वयाची अजिबात अट नाही. जीवनात आलेल्या प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या कर्तृत्वाने अन चतुराईने संकटांवर मात करणारा एक उत्तम विद्यार्थी हाच इतर लोकांसाठी गुरू असू शकतो आणि तोही आयुष्यात कुठल्याही क्षणी होऊ शकतो. 

गुरू सर्वगुणसंपन्न आहे... गुरू सर्वव्यापी आहे आणि तो सर्वश्रेष्ठ आहे. पण तो सापडायला मात्र एक उत्तम विद्यार्थी असणे हाच सर्वात सोपा मार्ग आहे. 

गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुदेव महेश्वर:। 

गुरु साक्षात्परब्रह्म तस्मैश्री गुरुवे नम:।।

****